श्रीनामदेवरायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग: १

 


नामा जपे सदा काळी । रामकृष्ण नामावळी ।
 विठ्ठल विठ्ठल हृदयकमळीं । जपतसे सर्वदा ।। 

श्रीम‌द्भागवतामध्यें ब्रह्मदेव देवतांना सनकादिमुनींची कथा सांगताना म्हणाले, 'हे माझे चार मानसपुत्र, सनक, सनंद, सनातन आणि सनत्कुमार आकाशमार्गाने सर्व लोकांत भ्रमण करीत असताना एकदा ते शुध्द स्वरूपी भगवान् सुन्दस्वरूपी श्रीविष्णुच्या दर्शनासाठी दिव्य अशा वैकुंठलोकांत गेलें. त्या वैकुंठलोकाचा महिमा असा आहे की, तिथे राहाणाऱ्यांचे स्वरूप विष्णुसारखीच चतुर्भुज, शंख-चक्र-गदा- पद्मधारी, सावळी असतात." पण प्रामुख्याने भागवतकार भगवान् महर्षी श्रीव्यास लिहितात "येऽनिमित्तनिमित्तेन धर्मेणाराधयन् हरिम् ।।" (३:१५:१४) की "जे निष्काम धर्माचरणाने श्रीहरिची आराधना करतात, त्यांनाच हा दिव्य लोक प्राप्त होतो". या वैकुंठात शाश्वत परमसुख प्राप्त करण्याकरीता देवही मनुष्य जन्म मिळावा म्हणून भगवान् श्रीहरिची आराधना, त्याचे गुणसंकीर्तन करण्याचे भाग्य मिळावे यासाठी परमेश्वराची आर्थना करतात. तेथे केवळ भगवंताच्या कीर्तीचे गान होत असून त्या भक्तीमध्यें देहभान विसरून, शरीर पुलकित होत्साता नेत्रांतून प्रेमाभू वाहू लागतात. असा हा सत्यलोकाच्याही वर असलेला वैकुंठ भक्तश्रेष्ठांना विष्णुच्या सेवेमुळे प्राप्त होतो. जिथे सनकादि ऋषी योग सामर्थ्याने भगवंताच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना मोठा परमानंद झाला, असें वैकुंठमहात्म्य ब्रह्मदेवाने वर्णन करून सांगितले. 

"संत सनकादिकां लावियेले वेधीं । तींही संसार  उपाधि सांडियेली ॥" - भगवंताने सनकादिकांना आपल्या निर्मळ प्रेमपाशात जखडून वेड लावले. त्यांचे मन संसार आसक्तीतून मुक्त केलें, असें नामदेवरायांनी आपल्या अभंगात म्हटले आहे. खरे पाहता सनकादिमुनी उत्पत्तीपासून विरक्त होते. पण नामदेवराय भगवद्‌भक्ती आणि त्या उपर भगवंताचे प्रेम कशा प्रकारचे असते हे दाखविण्याकरीता हे वचन रचले. श्रीविष्णुचे दिव्य वैकुंठधाम चर्मचक्षुंना अगोचर असें निवासस्थान आहे.  

त्या वैकुंठलोकापेक्षाही श्रेष्ठ असें "भूवैकुंठ" पंढरपूरचे कौतुक संतांनी अधिक केलें आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराज त्याविषयीं लिहितात : "बाप तीर्थ पंढरी। भूवैकुंठ महीवरी। भक्त पुंडलिकाचे द्वारीं । कर कटावरी राहिला ॥"... "हाचिं मानीं रे विश्वासु । येर सांडी रे हव्यासु । जरी तूं पाहसी वैकुंठवासु । तरी तूं जाये पंढरीये ।। - पंढरपूरचा महिमा असा आहे की, हे सर्व तीर्थक्षेत्रांत वरिष्ठ असून पृथ्वीवरील वैकुंठच आहे. तिथे श्रीविठ्ठल भक्तराज पुंडलिकाचे दारी कमरेवर हात ठेवून उभा राहिला आहे. पंढरीसारखे तीर्थ आणि पांडुरंगासमान दैवत हे अन्य नाहीं हे पक्के ध्यानांत ठेव विश्वासाने मान. अिंतर क्षेत्रात जाण्याचा हव्यास सोडून पंढरीस जा, तिथेच वैकुठं कसा असतो ते पाहता येथील. पुढे ज्ञानोबा म्हणतातः "पंढरी म्हणजे भूवैकुंठ। ब्रह्म तंव अभेचि दिसताहे नीट । या हरिदासासी वाळुवंट । जागरणासी दिधलें ॥" - हे पंढरपूर म्हणजे साक्षात वैकुंठ होय. तेथे परब्रह्म साकार रूपांत समचरण उभें असून त्याचे दर्शन घ्या आणि हरिदासांकरीता जागरण तथा नामसंकीर्तनाकरीता भीमातीरीचे वाळवंट त्याने दिले तिथे कीर्तन करा. असें हे सर्वांमानी श्रेष्ठ पुण्य भू-वैकुंठ होय. 

सत्यलोकाच्याही वर स्थित दिव्य वैकुंठलोक आणि पंढरपूर ही पृथ्वीवरील भूवैकुंठनगरी याचा संबंध हा दोन्ही स्थानी नित्य चालत असलेल्या श्रीहरिच्या गुणसंकीर्तनाचा आहे. संतांनी पंढरीची तुलना वैकुंठाशी केली ती का, यासाठी संत वचनांचे अंतरंग नीट जाणून घ्यावे लागते. नाहींतर असें महाभाग आहेत की त्यांना ही वर्णने अतिशयोक्ती वाटून प्रक्षिप्त म्हणून बाजूला काढतात. पण हे योग्य नव्हे.
पंढरपूर क्षेत्राविषयीं नामदेवराय वर्णन करतात: "धन्य धन्य ऐसें चंद्रभागातीर्थ । तेथें चतुर्भुज होती प्राणिमात्र। ऐसें आणिक नाहीं क्षेत्र । भूवैकुंठ पंढरी ।।" जसें भागवतात वर्णन केल्याप्रमाणे वैकुंठगत सगळेजण विष्णुप्रमाणे चतुर्भुज असतात, याच प्रकारे चंद्रभागेच्यातीरावर असलेल्या पंढरपूरक्षेत्री प्राणीमात्र चतुर्भुज होऊन विष्णुमय होतात, हेच भूवैकुंठीचे दिव्यत्व आहे. 

वैकुंठ आणि पंढरपूर याचा संबंध नामदेवरायांच्या विष्णुसहमचिंतनाशी कसा काय जोडता येईल, असा प्रश्न निर्माण झाला असेल. वरील वर्णन करण्यामागचा हेतु नाम चिंतनाशीच निगडीत आहे. तो असा -
पंढरपुर क्षेत्र सुदर्शनावर वसविले आहे असें सकल संताची मान्यता आहे श्रीनामदेवराय म्हणतात: "भूमि ते राहिली विष्णुचक्रावरी । वैकुंठची परी सर्व येथें ॥" श्रीविष्णुच्या सुदर्शनावर आधारलेली पंढरी असल्याने त्या चक्राचे मध्य हे "नाम" आणि त्याचा व्यास हे "कीर्तन" या दोन तत्वांवर आहे हे निश्चित. त्यासही पुन्हा नामदेवरायांच्या वचना आधारे बोलावयाचे तर, "पंढरीचे सुख पाहतां एक घडी । वास कल्प कोडी वैकुंठींचा ||" पंढरपूराचे सुख तीन गोष्टीत सामावले आहे. श्रीविठ्ठलाचे सगुणदर्शन, विठ्ठलाचे नामस्मरण आणि विठ्ठलाचे नामसंकीर्तन अशा पंढरीत निवास करणाऱ्याला वैकुंठातील एक कल्पापर्यंत निवासाचे पुण्य मिळते. "ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुलभ । जेथें समारंभ हरिकथेचा॥" ज्या नामस्मरण आणि कीर्तन सतत केलेल्या क्रियेचे फलित वैकुंठलोक आहे, ते या भूतळी पंढरपूरात अनायासे प्राप्त होते.
वारकरी सांप्रदायांत याच नामस्मरण आणि नामसंकीर्तन उपासना साधनेचे अनन्य साधारण महत्त्व श्रीपांडुरंगाचे प्राकट्य पंढरपूरात झाल्यापासून अठ्ठावीस युगे अविच्छिन्नपणे चालू आहे. "धन्य धन्य जगी ठाव | होतो नामाचा उत्सव |" नामाचा नित्य उत्सव हा पंढरीचा महिमा आहे असें श्रीतुकोबांनी वर्णन केलें आहे.
"कलौ संकीर्त्य केशवम् ।" - कलियुगांत श्रीकेशवाचे संकीर्तन करण्यासारखे उत्तम साधन अन्य नाहीं असें भागवतात म्हटले आहे. श्रीएकनाथी भागवतामध्यें नामस्मरण तथा नामसंकीर्तन या दोन साधनेंविषयीं अनेक ओव्या श्रीएकनाथ महाराजांनी रचल्या आहेत. पांचव्या अध्यायांत ते म्हणतात: "अवधारी राया सर्वज्ञा । धन्य धन्य कलियुग जाणा । जेथें सर्व स्वार्थ हरिकीर्तना - । नामस्मरणासाठी होती ।।" योगेश्वर चमस ऋषी राजा निमि यांस सांगतात, हे कलियुग अत्यंत धन्यता प्राप्त करून देणारे आहे, कारण या युगांत नामस्मरण तथा नामसंकीर्तनाद्वारें सर्व मनोरथ सिद्धीस जातात. "कलियुगी हेचि थोरी। नामसंकीर्तन वारी । चहूं वर्णा मुक्त करी । तेथ न विचारी स्त्री शूद्र ॥" (ए.भा. ५:४०३, ४१५) भगवंताचे नामस्मरण, कीर्तन करण्यासाठी कुठलाही अधिकार लागत नाहीं असें संतवचन जागोजागी आपल्याला सांपडतात. नामस्मरणाची थोरवी नामदेव महाराज निवेदित करतात: "काळ वेळ नसें नामसंकीर्तनी उंच-नीच योनी हेही वसे ।" त्यासाठी काय करा. तर,  "धरा नाम कंठी सदासर्वकाळ । मग तो गोपाळ सांभाळीला॥ कृपाळु कोवसा सुखाचा सागर । करील उद्धार भाविकांसी ॥" म्हणूनच लोक हो,
"नामा म्हणे फार सोपें हे साधन । नाचे नाम घेणें अितुकेंची।।"  ; याचा भावार्थ असा की, भगवंताचे नाम घेण्यासाठी तथा कीर्तन करण्याकरीत कुठलीही अवस्था आड येत नाहीं. करणे एवतढेच, सर्वकाळ त्या गोपालाचे नाम मुखात असणे, मनांत दृढतेने घरून ठेवणे, म्हणजे "हरिसी करुणा येईल तुझी" मग तो कृपावंत, सुखाचा "महानिधि" भक्तांना या भवसागरातून उद्धरून नेतो. असें हे अत्यंत सुलभ, सोपे नाम घ्या अशी साद नामदेवराय मुमुक्षूंना घालतात. 

वारकरी सांप्रदायांच्या नियमावलीला 'सिद्धान्त पंचदशी' म्हणतात. वारकऱ्यांनी पाळावयाच्या पंधरा विधिनिषेधांचा त्यांत समावेश आहे. त्यामध्यें नवविधा भक्ती अंतर्गत 'नामस्मरण' आणि कीर्तन' ही दोन उपासनेची महत्त्वाची साधने सांगितलेली आहेत. त्यामध्यें विष्णुसहस्रनाम प्रशस्त सांगितले आहे. "विष्णुसहस्रनाम हे स्तोत्र स्वयमेव नामस्मरण तथा नामसंकीर्तनाने परिपूर्ण साधन आहे. ज्या योगे विनासायास अखंड भगवत्कीर्तन घडते. "

प्रस्तुत विषयासंबंधी ही प्रस्तावना करण्याचे कारण असें की, स्वतः श्रीनामदेवरायांनी त्यांच्या जीवनामध्यें भगवंताचे नामस्मरण आणि त्याच्या गुणाचे, लीलांचे कीर्तन या व्यतिरिक्त अन्य दुसरी उपासना केली नाहीं आणि ते त्यांनी अभंगाद्वारें केलेंल्या उपदेशामधून ठायी ठायीं दिसते. नामभक्ती, विठ्ठलप्रेम, याखेरीज काहीं सांपडणें नाहीं. त्यांच्या या निर्मळ, निष्काम भक्तीमुळेच प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्या समीप वसत असें. कीर्तनात नाचत असें आणि प्रेमाने पुढे केलेलु दुधाची वाटी पीत असे, "हरिनाम गंगे सुस्नात पै झाला। नाम्या जवळी आले केशिराजा।।"

⭐ श्रीनामदेवरायांची नामस्मरण भक्ती: ⭐
श्रीनामदेव महाराज स्वतःचे आत्मवृत्त सांगताना म्हणतात, काहीं रोपे दऱ्या- खोऱ्यामध्यें उगवतात, त्यातली काही गळून वाळून कोरडी होऊन जातात. काहींना पुष्प फळांनी बहर येतो काहीं उगवताच गळून जातात. परंतु या नामदेवरुपी रोपाचे बीज प्रत्यक्ष केशवरायाने लावले असून त्याच्या कृपा प्रसादाने त्याच्याच द्वारीं उगवलो नि अंतर्बाह्य ब्रह्मस्वरूप होऊन राहिलो, "नामा उगवला केशवद्वारीं। न माये आंत बाहेरी ।।" अशी आपल्या जन्माची सार्थकता नामदेवराय निवेदन करीत असताना त्यामागे युगांची पुण्याई आहे असें नामदेवचरित्र अभंगात श्रीएकनाथ महाराज म्हणतात: "पूर्वी जो प्रल्हाद तोचि जाणा अंगद। तोचि उद्धव प्रसिद्ध कृष्णावतारीं। कलि माजीं जाणा नामदेव म्हणती। लडिवाळ श्रीपती लडा पाळी।।"  :  नामदेवरायांची जन्माची परंपरा थेट भगवद्भक्त प्रल्हाद, वालीपुत्र अंगद ते श्रीकृष्णसखा उद्धव अशा प्रकारे आहे. मग (६३६ ) "भक्तवत्सल" श्रीपांडुरंग बाल नामदेवाने प्रेमाने पुढे केलेल्या नैवेद्याचा प्रत्यक्ष स्वीकार का नाहीं करणार.

आपल्या बाल्यावस्थेतल्या अभंगात लिहिताना नामदेवराय म्हणतात :  "माता वाट पाहे नामा अजून कां नये । देखोन विठ्ठल काय भुलला तेथें । एसें मज पाहता हेंचि घडे साचें । विठ्ठलीं मन त्याचे गुंतले असें । काय सांगो माय जान देवळासी | जपतो अहर्निशीं विठ्ठलनाम ।।" -  नामदेवरायांच्या मातोश्री गोणाई देवळात गेलेल्या नामदेवास बराच उशीर होऊन अजून येत कसा नाहीं म्हणून वाट पहात आहे. तिच्या मनांत असा विचार आला की विठ्ठलाला पाहून तो भुलून त्याच्या रूपाला पाहून तो गुंतून गेला आहे. बायांनो! काय सांगावे तुम्हाला, हा नामदेव सदैव देवळात बसून विठ्ठल विठ्ठल या नामाचा रात्रंदिवस जप करीत असतो. "विठ्ठल विठ्ठल हेचि पैं चिंतन। विटेसहित चरण धरियेले ॥" या नाम प्रेमाचे बाळकडू नामदेवांना वयाच्या पांचव्या वर्षापासून प्राप्त झाले. "पंचवरुषी नामा जाहला। छंद विठूचा लागला ।।" असें चरित्रगान श्रीएकनाथ महाराजांनी केलें आहे.

नामदेवरायांची नामभक्ती ही जन्मजात उत्पन्न झालेली. त्यांच्या अभंगात त्यांनी तसे लिहून ठेवलें आहे "..... शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा । नाममंत्र खुणा वाचुनि पाहे || ऐशी आयुष्य पत्रिका प्रमाण। नामसंकीर्तन नामया वृद्धि।।" : नामभक्तीने परिपूर्ण असे शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा करून नामदेवरायांच्या प्रत्येक रचनेमध्यें त्याचे प्रतिबिंब आपल्याला वाचताना भावते. ऐशी वर्षाच्या आयुष्यांत भगवंताच्या नामसंकीर्तनाद्वरें भगवद्भक्तीचा प्रसार हेच जीवित कार्य असणार असें नामदेवरायांनी म्हटले आहे.

नाममहिमा कथन करताना नामदेवराय म्हणतात, ब्रह्मदेवाने सृष्टिनिर्मिली पण त्यासही नामाची महती कळाली नाहीं.  कर्म, धर्म, वर्म सगळे एका नामातच सामाविलेले आहे. नामातच
स्नान, संध्या, वेद असून आचमनाच्याही आधी नामच घेतले जाते.
लग्न असो वा प्रायश्चित वा श्राद्धात "एको विष्णु:" असेच नाम उच्चारावे लागते. "नामें होय गति नामे होय मुक्ती । नामयाचे चित्ती रामनाम ॥"

जन्मजन्मांतरीची पुण्याई एकवटते तेव्हां मुखामध्यें रामनाम येते.   त्या परम मंगल शस्त्राने  "नामचेनि बळें अडविली साधनें । तोडिली बंधने संसाराची ।।" त्या रामनामाच्या प्रतापाने "समुद्री पाषाण तारीयेले।"  अतः "नामा म्हणे असें सांगो आतां किती । नामापाशी मुक्ति उभी असे।।"
जे जे म्हणून पदार्थ आकारास येतात ते नष्ट होणे प्राप्त आहे. मात्र नाम ही अशी वस्तु आहे जी केव्हांही नाश पावणार नाहीं, असें सकल संतजनांनी प्रचितीपूर्वक म्हटले आहे. त्यांच्या वचनाला नामदेवराय प्रमाण मानतात: "नामदेव म्हणे संतांचिया कृपे। माजी नाम सोपे नांदतसे ||" या हरिनामाच्या बळाने अिहलोकी उध्दार निश्चित आहे असें नामदेवराय विश्वासाने सांगतात.

नामदेवराय नाममहती विशाद करताना नामस्मरणाने मनुष्यदेहाचे सार्थक होते हे निरनिराळ्या तऱ्हेने बिंबवतात, त्याच प्रकारे त्यांच्या मूळ कोमल स्वभावानुसार लडिवाळ पद्धतीने भगवंताची स्तुती करताना म्हणतात : अमृताहून गोड। नाम तुझें देवा ॥  सर्वाहून मधूर नामामुळें भगवद्भक्तांचे परमेश्वर कसा सांभाळ करतो याचे वर्णन करताना लिहितात, जळत्या अग्नीच्या कठीण प्रसंगातून पांडव वाचले, हनुमंताला इजा झाली नाहीं, प्रल्हाद तरला, सीतामाई, गोपाळ, बिभिषण यांचे रक्षण झाले अशी भावविभोर अभंगरचना आहे. 


"नामाचे चरित्र सदा अति गोड । तीर्थे काय चाड नाममात्रें ॥"कापराचा अग्निशी मेळ झाला की जसा कापूर अग्नीत एकरूप होतो, तद्वत नामाग्निने प्रज्वलित झालेला नरदेह नामातच समरस होतो. मग नाम आणि नामी यात द्वैत न राहता : "नामदेव म्हणे अनामतें नाम । नाना नामभ्रम तेंथे दुजा ||" नाम हे काहीं निराळे नसून प्रत्यक्ष परमात्माच आहे. जरी नाम अथवा अक्षर भेदाने ते निराळे दिसले तरी तो भ्रम असून त्यात भिन्नत्व नाहीं.

अशा नामदेवरायांच्या पराकोटीच्या नामस्मरण भक्तीमुळे श्रीपांडुरंग त्यांचे अंकित झाले. नामें पंढरीनाथा भेटविले ॥ अशी अलौकिकता काव्यातून अकराली.

नामदेवराय नामस्मरण भक्तीने काय प्राप्त आहे हे सांगताना म्हणतात: "नामा म्हणे नको उदंड सायास । तोडी भवपाश रामनामें ॥"  राम, कृष्ण, अच्युत, अनंत अशी नामे त्वरेनें स्मरण करा म्हणताच पुढल्या चरणांत साही अवधड साधने करण्यापेक्षा एक रामनामाचा जप भवपाश मोडून टाकतो अशी आर्त साद घालतात.

⭐ श्रीनामदेवरायांची नामसंकीर्तन भक्ती: ⭐

नामदेवरायांची नामस्मरणभक्ती वाढत वाढत भगवंताच्या गुणैश्वर्याचे संकीर्तन करण्यापर्यंत येऊन ठेपली. बालवयात नामदेव जसें विठ्ठलाच्या देवालयांत नामस्मरणकरीत तासंतास बसत असत असा उलेख आहे, त्याप्रमाणे त्यांनी कीर्तन सेवेला नेमकी कधी सुरुवात केली याचा थांग लागत नाहीं. आत्मचरित्रपर अभंगात आई गोणाईंना उद्देशून असलेल्या अभंगात ओइतरता उल्लेख सांपडतो - "टाळ दिंडी घेऊनि नाचतो रंगणी । तेणें माझ्या मनीं सुख वाटे ॥" ही लहानपणीची आठवण ते सांगतात. परंतु कीर्तनाचा स्पष्ट उल्लेख नाही. तथापि, महाराष्ट्र वैष्णव सांप्रदायात कीर्तन परंपरेचे गुरु हे नामदेव महाराज होय. नामभक्तीच्या प्रसाराकरीता, भागवत धर्माचा ध्वज सर्वत्र फडकविण्यासाठी बुवांनी कीर्तनाचे प्रभावीं माध्यम निवडले. "आम्हां कीर्तन कुळवाडी । आणिक नाहीं मुदीम जोडी ॥" - कीर्तनाद्वारें भगवंताचे नामस्मरण, दिव्यलीला वर्णन करणे हेच जीवितकार्य असून लौकिक व्यवहारात (माझे) मन रमत नाहीं, असें नामदेवराय म्हणतात, त्याचा परिपाक "नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी।।" अशी सद्गुरुकृपेनें व्यापक भूमिकेतून भगवताचे कथागान करीन कीर्तनाव्दारे नामामध्यें तल्लीन होत्साता समाजात ज्ञानदीप प्रज्वलित करण्याचे व्रत नामदेवरायांनी आजन्म घेतले.


परमेश्वराला शरण गेल्याखेरीज शाखत सुखाचा लाभ होणे नाहीं  "ऐकता कीर्तन होती जीवन्मुक्त । दाविसी अनंत नाममानें ॥" कीर्तनाच्या श्रवणाने मनुष्य आत्मज्ञानी होऊन संसाराच्या तापत्त्रयापासून विलग होत्साता मुक्तीचा परमानंद भोगतो नि नामचिंतनाने प्रत्यक्ष भगवद्दर्शन घडते. हे नामदेवरायांचे अनुभवाचे वचन आहेत. ज्यांच्या कीर्तनात स्वतः पांडुरंग नाचत असे, त्या नामदेवरायांचे भक्तीऐश्वऱ्याची मोजमाप कुठल्या तऱ्हेने करावी! "कीर्तनाच्या सुख होतो देव। कोणते वैभव वाणी आतां ॥" हे "सुखाचे सुख" त्यांनी लिहून ठेवले आहे. संकीर्तनामुळे मृत्युचेही भय उरत नाहीं आणि भय उरत नाहीं आणि अनायसे नामांत जीव रममाण होतो. नामस्मरण आणि नामसंकीर्तनाचा मेळ आहे तो असा: "करू हरिकथा कीर्तन । तोडूं यमाचें बंधना एवढा प्रताप नामाचा । रीघ नव्हे काळीकाळाचा ।।" असें म्हणत नामदेवराय थेट पंजाबपर्यंत कीर्तन परंपरा घेऊन गेले. 


आषाढी आणि कार्तिकी यात्रा म्हणजे वारकऱ्यांसाठी पर्वणी काळ. नामघोष, कीर्तन याने पंढरपूराचे दशदिशा अक्षरश: दुमदुमत विठ्ठलमय झालेलें असतात. अशावेळी नामदेवराय म्हणतात, संत दर्शन तथा आलिंगनाने चित्त शांत होते हे नवल नसून जीवाला ब्रह्मानंदाचा लाभ होणे हे विशेष होय, त्याचे कारण - "आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी । शोभा पांडुरंगी धनवटे ।।" 

भक्तीरसांत आकंठ बुडालेले नामदेवरायांचे कोमल हृदय अशावेळी भावूक होते. ते हळुच पांडुरंगाला आपल्या मनीचे गुज निवेदन करताना आर्ततेने सांगतात : "आषाढी कार्तिकी विसरू नका मन । सांगतसे गुज पांडुरंग ।।" नामदेवरायांच्या नामसंकीर्तन भक्तीचे मर्म या चरणांत एकवटलेले दिसते. त्यांची पांडुरंगाशी असलेल्या सख्यभक्तीचा हा परमोच्च आविष्कारच म्हणावा लागेल.


प्रस्तुत विषय नामदेवरायांचा सहस्रनाम चिंतन असला तरी नामस्मरण आणि नामसंकीर्तन याचा उहापोह म्हणजे नमनाला घडाभर तेल असे नसून त्यामागे प्रयोजन त्यांची नाम आणि कीर्तन यावर असलेली संवेदनात्म श्रध्दा. ती त्यांच्याच वचनाद्वारें आपल्याला काहींशी उमगू शकेल आणि पुढच्या विषयाकरीता पार्श्वभूमी तयार होण्यासाठी आवश्यक म्हणून हा खटाटोप. त्यावर माझ्यासारख्या सामान्याने विश्लेषण करावें हे अत्यंत बाळबोधच होय. नामदेवरायांच्या शब्दांना दैवी स्पर्श आहे. त्यामुळे नामदेवरायांच्या अभंगातली वचने जसेच्या तसे घेऊन त्यातला भावार्थ माझ्या अल्पस्वल्प बुद्धीने उलगडण्याचा प्रयत्न हा केवळ त्यांच्या कृपेचा प्रसाद आहे. 


मागे उलेख केल्याप्रमाणें वारकरी सांप्रदायांत पंचदशी सिद्धांतामध्यें महाभारतांतर्गत श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र महत्त्वाचे साधन असल्याने प्रत्येक संतांनी या स्तोत्राची उपासना निश्चित केलीं असणार असें त्यांनी केलेल्या अभंगांवरून लक्षांत येते.


"विष्णुसहस्रनाम भगवंताच्या गुणांची नामावलीच आहे. महाभारतामध्यें शांतिपर्वात अर्जुन भगवंतास निवेदन करतो, "न ह्यन्यो वर्तयेन् नाम्नां निरुक्तं त्वामृते प्रभो।।(३४१) की भगवंता तुझ्यावांचून दुसरा कुणी तुझ्या "नामाम् -" "नामवलीचा" 

स्पष्टार्थ सांगू शकेल असें मला वाटत नाहीं - ह्यातही नामावली म्हणजे अनेक नामें असा अर्थ आहे. कारण नंतर भगवान् श्रीकृष्णाने त्या निरनिराळ्या नामांचा अर्थ अर्जुनास सांगितला आहे.

"सत्वर सत्वाचे जपती नामावळी । नित्यति आंघोळी घडे रया।। " की, सत्वगुणाचे भाविकजन त्वरेने नामावळीचा जप करतात, ते भगवंताच्या कृपेने नित्य सुस्नात होतात. श्रीतुकोबांचे असे वचत आहे. "धन्य धन्य भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेतां जीं दुबळी । ती आगळीं सदैव ॥" या भूमीची धन्यता आहे की जिथे भगवताची नामावळी प्रकट झाली. ज्यायोगे दीनदुबळे या नामावलीच्या साह्याने भाग्यवंत होत.


श्रीएकनाथ महाराजांनी म्हटले, "सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी।। पातकांची होळी । होत तेगें केली ये ।" ज्याच्या मुखी सतत नामावळी असून त्याची जिव्हां सदैव नामांत रत असते, त्याच्या पातकांची होळी होते.

कर्मयोगी श्री सांवतामाळींनी म्हटले आहे: "सावता म्हणे कांते, जये नामावळी । हृदयकमळी पांडुरंग ॥" , सतत नामावळीचा जप करीत मनांमध्ये पांडुरंगाचे ध्यान करावे असें आपल्या पत्नीला सांगतात.


नित्य नामावळीचा जप करणाऱ्यांना त्या हरिनामस्मरण, नामचिंतनाचे फल ; नामदेवराय सांगतात : "नाम जपे नामावळी। अखंड तप हेंचि सदा काळीं । हरिनामें पिटोनि टाकी। हाचि तरणोपाय सकळांचा ॥"

या निवडक वचनांमध्ये "नामावळी" हा शब्द एकेसारखा आहे, तो मुद्दाम उद्धृत केला. याचे कारण, या नामावळी किंवा नामावली अर्थ दोन अर्थानं होऊ शकतो. पहिला तर्क एकांच नामाचा माळेवर करतात तसा जप किंवा स्मरण. उदा. रामरामरामराम याचा निरंतर जप. किंवा दुसरा तर्क सहस्रनामासारखा भगवंताच्या अनंत गुणांचे दर्शन घडविणारे सहस्र या संखेत एखाद्या वेलीममाणे गुंफलेली "नामवल्ली". प्रस्तुत लेखाचा विषय सहस्रनामचिंतन असल्याने माझ्या दृष्टीला नामावळी" या शब्दाचा अर्थ भगवंताच्या असंख्य नामांची साखळी असा प्रतित होतो. सहस्रनामस्तोत्रासारखा. आणि जर एकच नाम म्हणजेच नामावळी या अर्थाने जरी शब्द घेतला तरी त्या एका नामाचे शंभर अर्थ निघू शकतात. श्रीमद्‌मध्वाचार्यांनी वचन सांगितले आहे. 'विष्णो सहस्रनामापि निरंतरशतार्थकम् ।" अतः एकानामाचे अनेक अर्थ विस्तार होतात. तीच नामावली. किंवा भगवंताच्या

अनंत लीला वेगवेगळ्या नामांनी वर्णन केल्यामुळे त्यास नामावली म्हणता येथील. नामें भगवत्महात्म्याचे विशेष गुणसंकीर्तन करणारी असून ऋषींनी ती गायिली आहे असें विष्णुसहस्राच्या प्रास्ताविक श्लोकांत म्हटले आहे.

"यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मन: । ऋषिभिः परिगीतानि..."

येथे तात्पर्य अितथाच की 'नामावळी' या शब्दाचा अर्थ एका किंवा अनेक नामांचा जप सतत करणे असा अर्थ संतांना अभिप्रेत असावा.


अशा या भूवैकुंठ पंढरपुरामध्यें भगवंताच्या नामस्मरणात, नामघोषात, नामसंकीर्तनात अखंड तल्लीन झालेल्या विठ्ठलभक्तांची मिरास वैकुंठीच्या सुखापेक्षा अधिक असल्यास आश्चर्य नाहीं. म्हणूनच देवही भूतलावर जन्म घेऊन हरिभक्ती करता. येथील या प्रयत्नांत असतात. नामदेवरायांचे सहस्रनामाविषयी प्रत्यक्ष स्वरूपांत केवळ पांच ते सहा अभंग गाथेमध्यें सांपडतात, अन्य असण्याचा संभव नाकारता येत नाहीं. काहीं ठिकाणी 'सहस्र' असा उल्लेख आला असला तरी संपूर्ण अभंग सहस्रनामाभोवती फिरत नसल्याने स्वतंत्र विश्लेषण न करता विवरणासाठी घेतलोल्या अभंगातच त्याचा समावेश करणे प्राप्त आहे.

- अनिकेत घिवलीकर, मुंबई. 

Comments

Popular posts from this blog

श्रीएकनाथ महाराजांचे विष्णुसहस्रनाम चिंतन, भाग :१

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत नवविधाभक्ती, भाग १