श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीवामनावतार
कृपा भाकितां जाहला वज्रपाणी । तया कारणें वामनु चक्रपाणी ।। - श्रीसमर्थ रामदासस्वामी भोगवादी प्रवृत्ती बळावली म्हणजे समाजातले सत्व निघून जाते. हा सिद्धांत नवा नाहीं, पुराणकाळापासून याचे दाखले आपल्याला पाहावयास मिळते. त्यातील इतिहास म्हणजे बलीराजाची कथा. भगवतभक्त प्रल्हादाचा नातू नि विरोचनाचा पुत्र बली ब्राह्मणांच्या जोरावर आणि आपल्या बाहुबलाने स्वर्गस्थ इंद्राचा पराभव करून गुरु शुक्राचार्यांच्या आशीर्वादाने इंद्र पदावर आरुढ झाला. देवमाता अदितीने घडलेला प्रकार पतिदेव ऋषी कशापांना कथन करून शोक व्यक्त केला. इंद्रादी पुत्रांना स्वस्थानापासून भ्रष्ट होण्याची पाळी आल्याचे सांगितले. झाल्या प्रकाराचा बिमोड करण्यास आणि देवांचे गतैश्वर्य पुन्हा कसे प्राप्त होईल याची पृच्छा तिने केली. कश्यपांनी अदितीस श्रीनारायणाची उपासना करण्याचे सांगून “पयोव्रताने” त्याची कृपा संपादित केल्यास देवांच्या कार्यास बळ मिळेल असें आश्वासन दिले तथा गेलेंले वैभव ते पुन्हा प्राप्त करू शकतील असेंही वचन दिले. त्याप्रमाणे अदितीने व्रतारंभ तथा द्वादशाक्षरी मंत्राचा जप सुरू केला. व्रता...